सातारा दि.१३ (हरेश साठे) महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी कार्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांनी रयतेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे, असे गौरवोदगार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव भव्य सत्कार सोहळा आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सातारा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या भव्य सभागृहात मोठ्या उत्साहात, दिमाखदार वातावरणात आणि समारंभपूर्वक सोहळ्यात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन हजारोच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, विविध शाखांचे प्रतिनिधी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, आणि शिक्षणप्रेमी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, खासदार नितीन पाटील, प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार विश्वजित कदम, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेवक परेश ठाकूर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर देशमुख, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, ठाकूर कुटुंबीय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांनी पुढे बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासाचा आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी उत्कृष्ट कार्य करून समाजात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगत त्यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. रायगड जिल्ह्याच्या विकासात तसेच रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे खासदार शरद पवार यांनी अधोरेखित केले. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञानदानाची कवाडे सर्वसामान्यांसाठी खुली व्हावीत, शिक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या ध्येयाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोठे कार्य उभे केले आहे. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कर्तृत्व, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर यश संपादन करत हजारो हातांना सन्मानाने रोजगार व आधार दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता ते सातत्याने योगदान देत असतात. समाजातील गरजू, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, समाजासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असून भावी पिढ्यांसाठी ते आदर्श असल्याचे खासदार शरद पवार यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक, आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. गेल्या ५२ वर्षांपासून आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये घडत आलो असून या संस्थेनेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मिळालेल्या प्रेमाने आणि सन्मानाने आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेशिवाय आपला एकही दिवस जात नाही, असे सांगताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची आणि शिकवणीची प्रेरणा आयुष्यभर मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी कायम पाठीशी उभे राहिल्याचे लोकनेते ठाकूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, दि. बा. पाटील आणि जनार्दन भगत यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपण रयत शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘कमवा व शिका’ योजनेत शिक्षण घेतले असून या महाविद्यालयानेच आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली. हेच महाविद्यालय आपल्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरल्याचे त्यांनी सांगितले.
आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, मात्र रयत शिक्षण संस्थेकडून प्रदान करण्यात आलेला ‘रयत माऊली पुरस्कार’ हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सन्मानाचा पुरस्कार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आई-वडील आणि शिक्षकांचे संस्कार व मार्गदर्शन लाभल्यामुळेच स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेता आले, असेही त्यांनी सांगितले.
“मी घडलो असलो तरी माझे घडणे अजून संपलेले नाही. रयतशिवाय राम घडला नसता,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही देत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन प्रवासाचा आणि अफाट कार्याचा आढावा मांडला. त्यांनी पुढे म्हंटले की, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आजचा हा सोहळा म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याप्रती व्यक्त करण्यात आलेला आदर आणि कृतज्ञतेचा भाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जडणघडण, त्यांचे सामाजिक कार्य आणि जनसेवा सर्वश्रुत असल्याचे सांगत दळवी म्हणाले की, आज सकाळी त्यांनी सहकुटुंब व शेकडो हितचिंतकांसह स्वतः शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाला आणि परिसराला भेट देऊन तेथील आठवणींना उजाळा दिला तसेच कर्मवीरांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. रयत शिक्षण संस्थेबद्दल त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाची ही मोठी साक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या घरी दररोज शेकडो लोक मदतीच्या अपेक्षेने येतात आणि कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी ओळख असल्याचे दळवी यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असून त्यांनी दिलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या देणग्यांचा हिशोब ठेवणेही कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवा या क्षेत्रांत केलेले कार्य अफाट असून त्यातून त्यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे. कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास असून त्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून जपला आहे, असे गौरवोद्गार चंद्रकांत दळवी यांनी यावेळी काढले.
आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या मनोगतात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वपूर्ण कार्याचा गौरव करताना, “दातृत्वाचे मोठे आणि पहिले नाव म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर,” असे गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्शांचा वारसा जपत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजासाठी केलेले कार्य कोणत्याही शब्दांत मोजता येणार नाही. विशेष म्हणजे त्यांच्या दातृत्वाला आजही पूर्णविराम लागलेला नाही. गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची वृत्ती आणि मनाचा मोठेपणा हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य असल्याचे कदम यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण व्हावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या पुढाकाराचाही विशेष उल्लेख केला. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांचे वडील पतंगराव कदम हे दोघेही रयत शिक्षण संस्था परिवारातील विद्यार्थी व पदाधिकारी असून त्यांच्यात जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. “मी जेव्हा रामशेठ ठाकूर यांच्या पाया पडतो, तेव्हा विधायक कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे हा केवळ त्यांचा अमृत महोत्सव नसून जनतेच्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा लोकोत्सव आहे,” अशा भावनिक शब्दांत आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले थोर विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आपल्या मनोगतातून विस्तृतपणे मांडला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाटचाल मांडताना अनेक उदाहरणे आणि किस्से सांगत एकप्रकारे जीवनपट त्यांनी अधोरेखित केला. रयतच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सामान्य कुटुंबात जन्म घेऊन अथक परिश्रम, दूरदृष्टी, शिक्षणाविषयीची तळमळ आणि समाजसेवेच्या बळावर लोकनेते म्हणून जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला आहे. २ जून १९५१ रोजी न्हावेखाडी येथे मातोश्री भागुबाई चांगू ठाकूर आणि पिताश्री चांगू काना ठाकूर यांच्या पोटी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जन्म झाला. बालपणापासूनच कष्ट, श्रमप्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणा यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. लहान वयातच आईला घरकामात मदत करणे, लाकूड फोडणे, विहिरीतून पाणी आणणे यांसारखी अनेक कामे त्यांनी केली. या अनुभवांमुळे त्यांच्यामध्ये मेहनत, जबाबदारी आणि स्वावलंबनाची भावना दृढ झाली. सन १९६४ मध्ये गव्हाण हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. श्रमाला प्रतिष्ठा देणे, स्वावलंबी बनणे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना याच काळात मिळाली. सन १९७३ मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी अल्पावधीतच लौकिक मिळविला. मात्र समाजासाठी अधिक व्यापक पातळीवर कार्य करण्याच्या ध्येयाने त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. एका जुन्या डंपरपासून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय पुढे मोठ्या उद्योगसमूहात विकसित झाला. दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रम यांच्या बळावर त्यांनी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले.व्यवसायात यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. विशेषतः शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ दिले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे, या विश्वासातून त्यांनी अनेक विधायक कार्यांना प्रोत्साहन दिले. सामाजिक बांधिलकी, शिक्षणप्रेम, उद्योजकीय दृष्टी आणि सेवाभाव यांच्या संगमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात त्यांचे कार्य सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरले असून संघर्षातून यश मिळवत समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख प्रेरणादायी मानली जाते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे रयत शिक्षण संस्थेशी असलेले नाते हे केवळ सदस्यत्वापुरते मर्यादित नसून ते भावनिक, वैचारिक आणि कर्तृत्वाच्या पातळीवर अधिक दृढ आहे. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था यांसारखी मोठी शैक्षणिक संस्था असतानाही त्यांनी रयत शिक्षण संस्था या आपल्या मातृसंस्थेप्रती असलेली निष्ठा आणि बांधिलकी कायम जपली. रयत शिक्षण संस्थेने दिलेल्या संस्कारांचे ऋण मानत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर रयतच्या प्रगतीला प्राधान्य दिले. रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी, पायाभूत सुविधा उभारणीसाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या विस्तारासाठी त्यांनी तब्बल १३५ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक देणगी दिली आहे. या माध्यमातून त्यांनी आपल्या मातृसंस्थेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या योगदानामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला बळ मिळाले आहे. शिक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभूतपूर्व योगदान रयत कधीही विसरणार नाही. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘शिक्षण सर्वसामान्यांच्या दारी’ या ध्येयाचा वारसा पुढे नेण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी सातत्याने प्रयत्न केले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी त्यांनी विविध स्तरांवर मदत केली. त्यामुळे रयतच्या विकासाच्या प्रवासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे कर्मवीरांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झालेला हा सत्कार सोहळा केवळ एका व्यक्तीच्या गौरवाचा कार्यक्रम नव्हता, तर शिक्षण क्षेत्रासाठी आयुष्यभर झटणाऱ्या, समाजाला परत देण्याची भावना जपणाऱ्या आणि मातृसंस्थेप्रती अखंड निष्ठा राखणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रती व्यक्त करण्यात आलेली सामूहिक कृतज्ञता होती. उपस्थित मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात हा सोहळा एक संस्मरणीय पर्व ठरला असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शिक्षण, समाजकारण आणि दानशूरतेतील कार्य पुढील अनेक वर्षे प्रेरणेचा स्रोत राहील, अशी भावना या सोहळ्यातून अधोरेखित होती.
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेल्या ‘रामशेठ नाबाद ७५’ या ग्रंथाचे तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘अमृतपर्व’ तसेच अमृतवेल या स्मरणिकेचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.
