पनवेल दि.28: कोरोना काळात जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्यातील, मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे म्हणून सर्वे धार्मिक स्थळे व मंदिरे तात्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्यावतीने शनिवार दिनांक २९ ऑगस्टला ‘दार उघड उद्धवा दार दार उघड’ घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकार भजन पूजन करणारे भाविक भक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे, ‘भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. केंद्र सरकारने ४ जून २०२० रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू केलेली सुद्धा आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम अटी शर्तीसह देवस्थाने धार्मिक स्थळे सुरु करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांकडून होत आहे. मात्र पुनश्च ‘हरिओम’ म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे. राज्यातील देवस्थानाचे धार्मिक स्थळे सुरू करून भजन किर्तन व भजन परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाह निगडित असलेले व्यावसायिक शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात सर्वत्र देवस्थान मंदिरे धार्मिक स्थळासमोर ‘घंटानाद’ आंदोलन सामाजिक अंतराचे पालन करून करणार आहे .या घंटानाद आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
