दलित पँथरची ज्वाला विझणार नाही – मलिका नामदेव ढसाळ
मुंबई दि.९: दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘दलित पँथर’ या लढावू संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण कुंदन गोटे यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे. दलित पॅंथरच्या पक्षश्रेष्ठी मलिका नामदेव ढसाळ यांच्या हस्ते त्यांना अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मलिका नामदेव ढसाळ यांनी ही नव्या संघर्षाची तयारी असल्याचे सांगतानाच दलित पँथर आज पन्नास वर्षांहून जास्त काळ झाला तरीही पँथरचे गारुड जनमानसात कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे आजही आवेशात लढणारे पँथर्स आहेत अशा सर्वांना एकत्र करून एक लढा उभारण्याची आज गरज आहे. खरंतर दलित पँथर हा एक सकारात्मक विचार असून हे एक हत्यार आहे आणि ज्वालाही आहे. आज ही ज्वलंत विचारांची एक लढ्याची नव्या क्रांतीची ज्वाला बुद्धभूषण कुंदन गोटे विझू देणार नाही हा विश्वासही यावेळी मलिका नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केला .
दलित पँथर संघटनेच्या माध्यमातून मुंबई अंधेरी येथील सम्राट अशोक हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन चारबंगला, अंधेरी येथे आयोजित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, धडाडीचे युवा नेते बुद्धभूषण कुंदन गोटे यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. दलित पँथर चे मुख्य प्रवक्ते संदीप जाधव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पद नियुक्तीची घोषणा केली. यावेळी विचार मंचावर केंद्रीय कार्यकारणी सोबतच राज्यस्तरावर कार्य करणारी मंडळी देखील विशेष उपस्थित होती. या कार्यक्रमाला समाजातील सर्वच स्तरातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दिली. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षश्रेष्ठी मलिका नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, “गोटे यांचा गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव संघटनेच्या उन्नतीस नक्कीच उपयोगी ठरेल, गेल्या पाच दशकांपासून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात झगडणाऱ्या या संघटनेला देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे. अशा संघटनेच्या नेतृत्वाची धुरा तरुण तडफदार मा.बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने संघटनेच्या आगामी कार्याला नवे बळ मिळणार आहे. असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्या नंतर बुद्धभूषण गोटे यांनी आपल्या नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की, “दलित पँथर ही संघटना म्हणजे क्रांतीची ज्योत आहे. मला मिळालेली जबाबदारी ही केवळ सन्मान नसून ती एक लढ्याची शपथ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रकाश घेऊन मी देशभरातील दलित, वंचित, शोषित समाजाच्या न्यायासाठी लढा चालू ठेवणार आहे.”
सर्वांना सोबत घेऊन हा लढा लढून पक्ष संघटनेची यशस्वी वाटचाल भविष्यात नक्कीच पहायला मिळेल किंबहुना युवा वर्गाला या पँथर लढ्यात सहभागी करून नवी शक्ती समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी उभारली जाईल.
यावेळी दलित पॅंथरचे मुंबई, महाराष्ट्रातील पँथर, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. नितीन खैरे यांनी सांगिलते की, दलित पँथर इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेला भगदाड पडण्याची ताकद असणारी शक्ती आहे. तसेच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लढा देणारी संघटना असल्याने बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे या लढाऊ संघटनेचे नेतृत्व आल्याने ही संघटना मोठ्या ताकदीने उभी राहील हा विश्वास व्यक्त केला. यावेळी सोलापूर येथील पँथर पारप्पा ढावरे तसेच संतोष भालेराव आणि कविता मगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दलित पँथर संघटनेची समाजाला आजही गरज आहे हे सांगत ‘दलित पँथर’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे यांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीचे नेते नितीनभाऊ मोरे हे आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनीही दलित पँथरचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना समाजावरील अन्याय, अत्याचाराविरुद्ध आपण खांद्याला खांदा देऊन लढा देऊ असे स्पष्ट केले. यावेळी दलित पँथरचे राष्ट्रीय सदस्य जनार्धन धायमुक्ते, महिला आघाडीच्या कविताताई मगरे, पँथर पारापा डवरे, भुजंग साळवी, संतोष भालेराव, दीपक साळवी, कय्युम सय्यद, किरण मांदळे, ॲड नितीन खैरे, युवा मित्र परिवार अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
