उरण दि 27 (विठ्ठल ममताबादे) 25 सप्टेंबर 2020 रोजी  चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृतींना 90 वर्ष पूर्ण होत आहेत. विद्यार्थी दशेतील 13 वर्षीय वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील लहान चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना मानवंदना दिली आहे.

     भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे स्वातंत्र्य काही एका दिवसात मिळालेले नाही, यासाठी 150 वर्षे लढा करावा लागलेला होता. वरद खुशाली विलास या विद्यार्थ्यांने कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांती पासून ते 3 सप्टेंबर 2020 या त्याच्या 13व्या वाढदिवसा पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांची 50 चित्रे पुर्ण करून भारतमातेसाठी ज्यांनी लढा देऊन आपणांस स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण घडवून आणले, विशेषतः पुढच्या पिढीला हा इतिहास फक्त पुस्तकातील रकाने न राहता देशाच्या निर्मितीचा आदर्श व्हावे, असा संदेश जणू त्याच्या चित्रकलेच्या छंदातून मिळत आहे. 

     पूर्वीचा कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर या गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला. त्यावेळी पोलिसांनी जो स्वैर गोळीबार केला होता, त्यामुळे जंगल सत्याग्रहाकरीता जमलेल्या सत्याग्रहीं पैकी आठ सत्याग्रहींना आपला प्राण गमवावा लागला. त्या स्मृतींना आज 90 वर्षे पूर्ण होत आहेत. चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवल 25 सप्टेंबर रोजी जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. वरद खुशाली विलास या पिरकोन गावातील विद्यार्थ्याने हुतात्मा आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे, हुतात्मा आनंदा माया पाटील – धाकटी जुई, हुतात्मा धाकू गवत्या फोफेरकर – चिरनेर,हुतात्मा नाग्या महादू कातकरी – चिरनेर, हुतात्मा रघुनाथ मोरेश्वर न्हावी – कोप्रोली, हुतात्मा रामा बामा कोळी – मोठी जुई, हुतात्मा हसुराम बुध्या पाटील – खोपटे, हुतात्मा परशुराम रामा पाटील – पाणदिवे या आठ हुतात्म्यांची चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करून आपल्या विद्यार्थीदशेत कलेच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!