पनवेल दि.२१: मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, कोरोना विषाणूच्या साथीस नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने, केंद्र व राज्य शासनाने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर १ जून पासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरीता सीएसएमटी पासून कसारा, कर्जत, पनवेल तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्यात आली. उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईची जीवन वाहिनी असून त्याद्वारे दररोज सुमारे ७०-७५ लाख प्रवासी प्रवास करतात. उपनगरीय रेल्वे सेवा बंद ठेवल्यामुळे तसेच राज्य शासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांमुळे मुंबईतील रूग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. तथापि, गेले ५ महिने उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे रोजी रोटीचे व्यवहार पूर्णतः बंद होऊन त्यामुळे कोटयावधी सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्टया हलाखीचे, उपासमारीचे जीवन जगत आहे हेही वास्तव आहे. उपनगरीय सेवा दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचे सामाजिक व आर्थिक, कौटुंबिक व्यवस्थेवर विपरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगून उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करणे आवश्यक असल्याची कारणे निवेदनात नमूद केली आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांसाठी सुरू असलेली उपनगरीय सेवा काही विशिष्ट स्थानकांवरच थांबतात. त्यामुळे या स्थानकांव्यतिरिक्त स्थानकांवरीले कामगारांना त्याचा काही उपयोग होत नाही. शिवाय अत्यावश्यक सेवेच्या गाड्या सकाळ संध्याकाळी गजबजलेल्या असतात व दिवसाचे इतर वेळी रिकाम्या धावतात. ज्या स्थानकांवर रेल्वे गाडी थांबत नाही, ती स्थानके पूर्णतः बंद असून, त्यामुळे रेल्वेला कोणतेही उत्पन्न मिळत नाही, पण रेल्वे स्थानकाच्या सोई सुविधांवर, रेल्वे कर्मचाऱ्यांचे वेतनावर खर्च होत आहे. पर्यायाने रेल्वेचे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे अशा रेल्वे स्थानकाबाहेरील रेल्वे प्रवाशांवर अवलंबून असलेले व्यवसाय पूर्णतः बंद असून या व्यवसायांवर रोजी रोटी अवलंबून असलेली कुटूंबे आर्थिकदृष्ट्या पुर्णतः उध्दस्त झालेली आहेत. सीएसएमटी ते कर्जत, कसारा, पनवेल ही वाहतूक सुरू असली तरी ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. या मार्गावर ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्र, एपीएमसी मार्केट इतर अत्यावश्यक आस्थापना असून त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुर्लामार्गे प्रवास करावा लागतो. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ठाणे – बेलापूर पट्टीतील बहुतांश औद्यागिक आस्थापना अंशतः सुरू आहेत, अशी रेल्वे सुरु करण्याची करणे अधोरेखित केली आहेत.
सध्या मुंबई व परिसरातील कोरोना साथीच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत असल्याने तसेच नमुद केलेली परिस्थिती विचारांत घेता दिनांक ०१ सप्टेंबर २०२० पासून उपनगरीय सेवा सर्वसामान्यांसाठी साथीच्या दृष्टीने आवश्यक असलेली खबरदारी घेऊन नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
