माथेरान दि.२१ (मुकुंद रांजणे) माथेरान मध्ये पहिल्यांदाच ई रिक्षा सारख्या पर्यावरण पूरक वाहनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून विशेष करून शनिवारी आणि रविवारी वर्षासहलीसाठी पर्यटकांचा महापूर याठिकाणी पाहवयास मिळत आहे. परंतु अवघ्या वीस ई रिक्षा या सर्व पर्यटकांना सुविधा देण्यास अपुऱ्या पडत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून ई रिक्षात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. कधी नव्हे एवढे दोन लाख पर्यटक यंदाच्या पावसाळ्यात केवळ स्वस्त, सुरक्षित आणि जलद वाहतुकीच्या सुविधेमुळे ई रिक्षाला अधिक पसंती देताना दिसत असून ई रिक्षातून प्रवास करण्यासाठी स्टँडवर ताटकळत उभे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या सहा महिन्याच्या पायलट प्रोजेक्ट वर ह्या ई रिक्षा सुरू असून केवळ वीस ई रिक्षा सेवा देत आहेत. परंतु पर्यटकांचा वाढता ओघ पाहता या सुध्दा कमी पडत असल्याने अनेकांना नाईलाजाने पायपीट करावी लागत आहे. लवकरच ह्या सेवेत वाढ करण्यात यावी अशी मागणी मोठया प्रमाणावर जोर धरू लागली आहे.

वीस ई रिक्षा जून महिन्यात सुरू झाल्या पासून दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. अवघ्या पस्तीस रुपयात पर्यटक दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड पासून थेट गावात येत असल्याने सर्वांची पायपीट वाचली आहे. मात्र वीस ई रिक्षांची संख्या अपुरी पडत आहे. पर्यटकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.मा सुप्रीम कोर्टाने ई रिक्षाची संख्या निश्चित करण्याची जबाबदारी सनियंत्रण समितीला दिली असल्याने उर्वरित ७४ हात रिक्षा चालकांना लवकरच ई रिक्षांची परवानगी द्यावी. (मारुती कदम – ई-रिक्षा चालक)

माथेरानला ई रिक्षांची संख्या खूपच कमी प्रमाणात असल्याने लोकल माणसांना आणि पॅसेंजरला एकएक करून रिक्षा दिल्या गेल्या. त्यामुळे अर्धा तास या रिक्षांची वाट पहावी लागली.युनियनने आणखीन ई रिक्षा वाढविल्या पाहिजेत म्हणजे कुणाचाही वेळ जाणार नाही. (सामर्थ्य वाडेकर – पर्यटक नाशिक)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!