ठाणे दि.१३: यावर्षी बुधवार दि. १६ ॲाक्टोबर रोजी मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री आपणांस कोजागरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे. त्या रात्री आपणास आकाशात सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. वातावरणात धूलिकण नसतात. चंद्राचे ठिपूर चांदणे पडते.. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह आनंद घेता यावा यासाठी कोजागरी पौर्णिमा येते.. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे, नारळपाणी देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.
कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागा आहे असे विचारते. जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.
“ को जागर्ति ? “ याचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या कोण जागा आहे असा नाही. तर शरीराची, घराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे ? असा त्याचा अर्थ आहे. त्याला समाधानाची लक्ष्मी प्राप्त होत असते. जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमान लोक राहतात, जिथे योग्य दिशेने परिश्रम करणारी माणसे राहतात तेथे लक्ष्मींचा रहायला आवडते.
सूपरमून दर्शन
यावर्षी कोजागरीच्या दिवशी खरोखरच दुग्धशर्करा योग आलेला आहे. कारण या आश्विन पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचे दर्शन होणार आहे. १६ आणि १७ ॲाक्टोबर रोजी आपणांस सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर सुपरमून दर्शन घडते. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के जास्त मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. १७ ॲाक्टोबर रोजी पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार १७३ किलोमीटर एवढ्या जवळ येणार आहे.
आश्विन पौर्णिमेचा प्रारंभ बुधवारी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी होणार असून समाप्ती गुरुवार १७ ॲाक्टोबर रोजी सायं. ४ वाजून ५६ मिनिटांनी होणार आहे. बुधवार १६ ॲाक्टोबर रोजी चंद्रोदय सायं. ५-२७ वाजता होणार असून रात्रभर चंद्र आपल्याला आकाशात सुंदर दर्शन देणार आहे. तसेच गुरुवार १७ ॲाक्टोबर रोजी सायं. ६-०९ वाजता चंद्रोदय होणार असून रात्रभर आपणांस आकाशात दर्शन देणार आहे असे दा.कृ.सोमण यानी सांगितले.
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग
🔸मला लोकांच्या आड येणारे नियम नकोत – मुख्यमंत्री
🔹सिडकोच्या जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय
♦️पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स वरील शास्ती माफ