कळंबोली दि.१६ : पर्यावरण संवर्धनासह, आदिवासी बांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टी.सी.एस.आर.डी. मिठापूर, रॅलीज इंडिया आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचा माध्यमातून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भीषण पाणी टंचाई असतानाही मागील तीन वर्षांत ५५०० रोपांची लागवड करून आज पर्यंत सरासरी नव्वद टक्के झाडे जगविण्यात यश यश आल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्राम पंचायत हद्दीतील तांबडी, उंबरमाळ,खवसावाडी, काजूवाडी आणि केळीची येथील १४६ आदिवासी कुटुंबांना कलमी पर्यावरण संवर्धनासह, आदिवासी बांधवांच्या रोजगार वृद्धीसाठी टी.सी.एस. आर.डी. मिठापूर, रॅलीज इंडिया आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने दोन हजार पाचशे कलमी आंब्या च्या रोपांचे वाटप करण्यात आले. ह्या पाचही वाड्यांमध्ये टीसीआरडी, रॅलीज इंडिया यांच्या वतीने उन्नत ग्राम प्रकल्प राबविले जात असून टाटा रॅलीचे तांत्रिक सल्लागार श्रीकांत म्हात्रे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्राम संवर्धनचे कार्यकर्ते राजू पाटील, सचिन पाटील, सरिता पाटील व राजेश रसाळ यांनी सदर झाडांचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे सदर पाचवी वाड्यांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष असतानाही येथील आदिवासी बांधव डोक्यावरून पाणी वाहून या झाडांचे संगोपन करत आहे त्यामुळे मागील दोन वर्षात लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण सरासरी नव्वद टक्के असल्याचे श्रीकांत म्हात्रे यांनी सांगितले.
![]()
