पनवेल दि.१२: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे 2024मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने तयारी करा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी आज केले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगडातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, खालापूर मंडल तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव आदी पदाधिकारी, नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या कालावधीत विविध योजना, निर्णय, उपक्रम राबवून सर्वसामान्यांना जीवनात आधार दिला आहे. राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असल्यापासून विविध लोकोपयोगी कामे करून जनतेचा विश्वास जिंकला आहे. रायगड जिल्ह्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना येणार्या काळात पक्षाची ताकद आणखी वाढवायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहणे आवश्यक आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा कायापालट केला. आज ते जगात सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, तर भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे मोठे मन दाखवून कार्यरत आहेत. भाजपची विचारसरणीच मी नव्हे; तर आम्ही अशी आहे. म्हणून आपला पक्ष मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशाच प्रकारे एकजुटीने व नेटाने काम करीत राहिलो तर येणार्या सर्व निवडणुका आपण जिंकू याची खात्री आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे या स्थानिक निवडणुकीतही आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. ते आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नसले तरी पालक आहेत, असे सांगून सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यप्रणालीने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्रियाशील शैलीने पुढे वाटचाल करूया, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही विजयी सरपंच, सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.