पनवेल, दि.16: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत आणि भूमिपुत्रांना व्यवसाय, नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे या मागणी करिता आज शिवसेनेतर्फे दणदणीत मोर्चा काढण्यात आला होता. परंतु या मोर्चाचा धसका अदानीच्या अधिकार्यांनी घेवून त्यांनी प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळल्याने आता मातोश्रीलाच येवून भेटा असा सज्जड दम यावेळी शिवसेना उपनेते मा.आ.सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिला.
शिवसेना उपनेते बबन पाटील, शिवसेना उपनेते मा.आ.सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांच्या नेतृत्वाखाली आज धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना महिला उत्तर रायगड जिल्हा संघटीका सुवर्णाताई जोशी, शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, शिवसेना महिला महानगर संघटीका लीना गरड, युवा सेना उत्तर रायगड जिल्हाधिकारी पराग मोहिते यांच्यासह इतर पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
सदर मोर्चाची सुरूवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल या ठिकाणाहून सुरू होऊन कार रॅलीद्वारे हा मोर्चा निघाला. विमानतळाच्या अलीकडे चिंचपाडाकडील नवी मुंबई विमानतळ गेट जवळ पोलिसांनी हा मोर्चा अडविला. त्यानंतर शिष्टमंडळाने अदाणी समूहाचे कार्पोरेट इन्चार्ज चेतन सुरवसे व सिक्युरिटी हेड नितीन सावंत यांची भेट घेतली. सदर बैठक ही अदानी समुहाचे मुख्य अधिकारी कॅप्टन शर्मा यांच्याबरोबर होण्याचे ठरविले होते. व त्यांना निवेदन देण्याचे ठरले असतानाही ते उपस्थित न राहिल्याने उपनेते बबन पाटील व सुरेंद्रनाथ माने यांनी संताप व्यक्त केला.
शिवसेनेचा अपमान करणार्यांना आम्ही सोडणार नाही आता निवेदन न देता जात आहोत. परंतु शिवसेना आपल्या पद्धतीने यापुढची आंदोलने छेडेल व तुम्हाला नाक घासत मातोश्रीवर यावेच लागेल. असा सज्जड दम उपस्थित पदाधिकार्यांनी दिला व तेथून निघून आले. अदानी समुह व सिडको प्रशासन नियोजन नसतानाही येत्या 30 तारखेला या विमानतळाचा उद्घाटन करण्याचा घाट घालत आहेत. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. परंतु कोणत्याही उपस्थितीत स्थानिक भूमीपुत्रांना न्याय न देणार्या या अदानी समुहाला शिवसेना आपली ताकद रस्त्यावर उतरुन दाखवेल व हे उद्घाटन होवूनच देणार नाही असा दम संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिला व कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शांत राहणार नाही, भूमीपुत्रांच्या लढ्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरु असे यावेळी जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी उपस्थित अधिकार्यांना सांगितले.
![]()
