कर्तृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर एकमेव व्यक्तिमत्व – ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे
पुढच्या वर्षी राज्यस्तरीय दिवाळी सर्वोत्कृष्ट अंकाला ०१ लाख तर रायगड जिल्हास्तरीय अंकाला ५० हजाराचे बक्षिस – लोकनेते रामशेठ ठाकूर यांची घोषणा
पनवेल दि.6: (हरेश साठे) पुस्तकातून आत्मसंवाद आणि त्यातून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, त्यामुळे इंग्रजी ज्ञानभाषा असली तरी निर्णय क्षमता मातृभाषेत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे यांनी राज्यस्तरीय दिवाळी अंक पारितोषिक वितरण समारंभात खांदा कॉलनी येथे केले.
शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १८, १९ आणि २० व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली (बुधवार, दि. ०५ जानेवारी) खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) मोठ्या उत्साहात आणि समारंभपूर्वक संपन्न झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फुटाणे बोलत होते.
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक दिलीप पांढरपट्टे, ललित मासिकाचे स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, दीपक म्हात्रे, तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्यस्तरीय २०१८ च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘अधोरेखित’ दिवाळी अंकाने, द्वितीय क्रमांक ‘चतुरंग अन्वय’, तृतीय क्रमांक ‘झपूर्झा’, सर्वोत्कृष्ट बाळ दिवाळी अंक ‘वयम’, उत्कृष्ट विशेषांक ‘ऍग्रोवन’, उत्कृष्ट कथा ‘चंद्रकांत’, उत्कृष्ट व्यंगचित्र ‘ हास्यधमाल’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘दीपावली’, सन २०१९ च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘शाश्वत वनीकरण’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’, द्वितीय क्रमांक (विभागून)’दीपावली’ आणि ‘पुरुष उवाच’, तृतीय क्रमांक (विभागून) ‘दुर्ग-शोध गडकिल्यांचा’ आणि ‘दुर्गाच्या देशातून’, उत्कृष्ट विशेषांक ‘समपथिक’, उत्कृष्ट कविता ‘खोडलेली कविता- कालनिर्णय’, उत्कृष्ट व्यंगचित्र ‘दीपावली’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘चतुरंग अन्वय’, उत्कृष्ठ अंतर्गत सजावट ‘अक्षरधारा’ तर सन २०२० च्या स्पर्धेत ‘अनलॉक’ आणि ‘लोकदीप’ या अंकांनी विभागून प्रथम क्रमांक, ‘संवादसेतू’ व ‘आंतर-भारती’ या अंकांनी विभागून द्वितीय क्रमांक, ‘कुबेर’ व ‘ओंजळीतील अक्षरे’ या अंकांनी विभागून तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट बाळ दिवाळी अंक ‘छावा’, उत्कृष्ट विशेषांक ‘तेजोमय’, उत्कृष्ट कथा ‘पॉपी टिअर(व्यासपीठ)’, उत्कृष्ट कविता- सकाळ (‘खरवडून पाहीन म्हणते’), उत्कृष्ट व्यंगचित्र ‘आक्रोश (संजय मिस्त्री)’, उत्कृष्ट मुखपृष्ठ ‘दीपावली’, उत्कृष्ठ अंतर्गत सजावट ‘किल्ला’ या अंकांने तर रायगड जिल्हास्तरीय २०१८ च्या स्पर्धेत ‘साहित्यआभा’ अंकाने प्रथम, ‘लोकसेवक’ अंकाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ‘उरण समाचार’, सन २०१९ च्या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘पर्ण’, ‘उरण समाचार’ ने द्वितीय तर तृतीय क्रमांक वादळवारा अंकाने तसेच सन २०२० च्या स्पर्धेत ‘आगरी दर्पण’ने प्रथम, ‘इंद्रधनु’ ने द्वितीय तर ‘रामप्रहर’ अंकाने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक रक्कम धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, अरविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. दीपा ठाणेकर, महेश कुलसंगे, प्रा. नम्रता पाटील, सुनिल कर्णिक, प्रा. डॉ. अलका मटकर, प्रा. जयप्रकाश लब्दे, विजय कुलकर्णी, प्रा. वर्षा माळवदे, नम्रता कडू, रामदास खरे, प्रतिष्ठा सोनटक्के यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक म्हात्रे यांनी तर परीक्षक मनोगत नीला उपाध्ये यांनी व्यक्त केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचा लाभ साहित्यप्रेमींनी घेतला. तसेच दिवाळी अंक स्पर्धेसंदर्भात मल्हार टीव्हीच्या माध्यमातून सादर झालेल्या डॉक्युमेन्ट्रीचे उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींनी कौतुक केले.
पुढे बोलताना रामदास फुटाणे यांनी म्हंटले कि, मराठी महाराष्ट्राची राजभाषा असताना महाराष्ट्रातील अनेक मंत्री प्रसारमाध्यांना मराठीत बाईट दिल्यानंतर पुन्हा हिंदी भाषेत त्याचे रूपांतर करत बाईट देतात, हा अवघड प्रश्नच असून मराठीच्या मारेकरींचा शोध लावला पाहिजे, असेही त्यांनी त्यांच्या शैलीत सांगत मराठीला स्वतःहून सन्मान दिला पाहिजे, असे अधोरेखित केले. दिवाळी अंकांनी साहित्य घडविण्याचे काम केले. मराठी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी उचलली आहे, म्हणून भरघोस रक्कमेची पारितोषिके असलेली राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याची पोचपावती रामदास फुटाणे यांनी दिली. यावेळी रामदास फुटाणे यांनी कोरोना व इतर विषयांवर कविता सादर करत अदृश्य कोरोनानारे जगण्याचे भान दिले असल्याचे आवर्जून नमूद केले. राज्यातील कानाकोपऱ्यातून दिवाळी अंक या स्पर्धेसाठी येतात हि अभिनंदनीय बाब आहे, असे सांगतानाच हि स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवा, शिक्षणसेवा, सांस्कृतिक सेवा असे विविध गुण आहेत. एकाच व्यक्तीत एवढे कर्तृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर एकमेव असतील असे गौरवोद्गार काढत हे आदर्श व्यक्तिमत्व मला सुद्धा प्रेरणा देतो, असेही त्यांनी दिलखुलासपणे सांगितले.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा पारितोषिक
प्रथम क्रमाक- ७५ हजार रुपये व सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक- ३५ हजार व सन्मानचिन्ह
तॄतीय क्रमांक- २० हजार रूपये व सन्मानचिन्ह
उत्कॄष्ट कथा – ०७ हजार रूपये
उत्कॄष्ट कविता – २५०० रूपये
उत्कॄष्ट व्यंगचित्र- २५०० रुपये
उत्कृष्ट विशेषांक ०५ हजार रुपये, \
उत्कृष्ठ मुखपृष्ठ ०५ हजार रुपये,
सवोत्कॄष्ट बालसाहित्य – ७५०० रूपये
रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा पारितोषिक
प्रथम क्रमांक- ३० हजार रूपये व सन्मानचिन्ह
व्दितीय क्रमांक- १५ हजार रूपये व सन्मानचिन्ह
तॄतीय क्रमांक- ७५०० रूपये व सन्मानचिन्ह