पनवेल, दि.23 (संजय कदम) : नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील तब्बल हरविलेले 40 लाख रुपये किंमतीचे 130 मोबाईल फोन गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलने आज नागरिकांना विशेष कार्यक्रमात परत केले आहेत.
पनवेल येथे असलेल्या गुन्हे शाखा कक्ष 3 कार्यालयात सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अविनाश काळदाते यांच्या विशेष पथकाने आज हे मोबाईल परत केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हदित मोठयाप्रमाणावर लोकवस्ती असल्याने येथे वास्तवव्यास असलेले तसेच कामानिमित्ताने आलेल्या लोकांचे प्रवासादरम्यान, खरेदीच्या वेळी तसेच इतर अनेक कारणास्तव त्यांचेकडील वापरते मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत पोलीस ठाण्यांकडे मोठ्याप्रमाणावर तक्रारी होत आहेत. अशा प्रकारे गहाळ झालेल्या मोबाईल फोन बरोबर फोन धारकाचे नातेवाईक, मित्र व परिचितांचे संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडीओ, महत्वाचा डाटा, मेसेज इत्यादी स्वरूपाने त्यांच्या आठवणी त्यात जतन केलेल्या असल्याने व असे गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळुन येत नसल्याने मोबाईल गहाळ होणे हा संबंधीत मोबाईल धारकांचा भावनिक विषय बनला जातो.
मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण लक्षात घेता गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरीता शासन स्तरावर सीईआयआरपोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी सीईआयआर. पोर्टलचा वापर करुन गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळविण्याचे अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलचे वपोनि अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सफौ अनिल पाटील, रमेश शिंदे, पोहवा प्रशांत काटकर, प्रमोद राजपूत, निलेश पाटील, दिपक डोंगरे, सागर रसाळ, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, अजित पाटील, हिरकणी पाटील, पो.ना.आजिनाथ फुंडे, विनया पाटील, पो.शि.लवंकुश शिंगाडे, विक्रांत माळी, प्रसाद घरत आदींच्या पथकाने पोलीस ठाणे स्तरावर सीईआयआरपोर्टल वर गहाळ झालेल्या मोबाईल फोनची तसेच संबंधीत फोन धारकाची आवश्यक ती माहिती भरल्यानंतर सदर हरवलेल्या मोबाईलचा शोध हा पोहवा इंद्रजित कानु, गुन्हे शाखा कक्ष 3, पनवेल यांचेकडुन देखिल समांतर शोध सुरू करून त्यांनी गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेल यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हदितील गहाळ झालेल्या मोबाईल फोन पैकी मागील तीन महिन्यात महाराष्ट्र राज्यातील तसेच परराज्यातील अंदाजे 39,75,000/-रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे एकुण 130 मोबाईल फोन परत मागवून ते संबंधीत मोबाईल धारकांना परत देवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
