पनवेल दि.२७: प्रत्येक वेळी घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून ठाकरे सरकार राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल येथे केली. त्याचबरोबर ‘अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है’ असा नारा देत महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका व शहर मंडल शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रदेश सदस्य श्रीनंद पटवर्धन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, विनोद साबळे, कामोठे अध्यक्ष रविन्द्र जोशी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर उपस्थित होते. बैठकीस लोकप्रतिनिधी आणि शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढे मार्गदशन करताना म्हंटले कि, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सन्मान दिला मात्र ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे पण ठाकरे सरकारचे त्याकडे का? दुर्लक्ष होत आहे असा सवाल करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना करुणा शर्मा यांचा टाहो का ऐकायला येत नाही आणि पूजा चव्हाणला न्याय का देत नाही असा प्रतिसवालही त्यांनी केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना कशाप्रकारे खंडणी वसुली करायला सांगतात याचे परमवीर सिंह यांनी आठ पानी पत्रातून जाहीर केले आहे मात्र तरी सुद्धा हे सरकार गृहमंत्री आणि सचिन वाझेला वाचविण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहे आणि हे संपूर्ण देश पाहत आहे. कोरोना नियंत्रण, महिलांवरील अत्याचार, सर्वसामान्यांचा विचार, गुन्ह्यांना आळा, घोटाळ्यांमध्ये वाढ, अशा चारी बाजूने या सरकारला अपयश आले आहे, असे सांगतानाच अनिल देशमुख, सचिन वाझेला वाचविण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली, असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन कोटी स्वयंसेवक आहेत. कार्यकर्ते ध्वजाला वंदन करून समर्पण आणि गुरुदक्षिणा देतात. यातून तळागाळात सामाजिक कार्य केले जाते. असे सांगून नाना पाटोळे यांचे नाव घेत हप्ता आणि खंडणी घेणाऱ्यांना समर्पण आणि गुरुदक्षिणा काय कळणार असा टोलाही त्यांनी लगावला. त्याचबरोबर कोरोनात मातोश्रीवर बसून गरम पाणी पिण्याचे सल्ले देणारे लोकांच्यात कधीच आले नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारच्या अकार्यक्षमपणाच्या चिंधड्या उडविल्या.
यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून कोरोना काळात भाजपने सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याचा अहवाल मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशाला आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी किमान पाच कोटी लोकांना मदत पोहोचविण्याचे आवाहन देशातील कार्यकर्त्यांना केले होते. त्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या काळात उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या माध्यमातून मोदी किचनच्या माध्यमातून ०१ लाख हुन अधिक नागरिकांना तयार अन्न, दिड लाखाहून अधिक लोकांना धान्याचे किट, देण्याबरोबरच लोकांना त्यांना आधार देण्याचे काम केले गेले. भाजप एकीकडे काम करीत होते तर अन्य पक्ष कामाऐवजी फक्त फोटोच काढत होते. या काळात लोकांची सेवा करण्यात भाजपचे कार्यकर्ते मागे राहिले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. लोकांची सेवा करीत असताना नगरसेवक संजय भोपी, बापू घारे, राजेंद्र बनकर यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले त्यांनी कोरोना काळात लोकांना केलेली मदत कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी लोकांपर्यंत जाऊन लोकांना मायेचा आधार दिला मात्र राज्य सरकार नेहमीच निद्रास्त राहिली आहे. असे सांगतानाच कोरोनाच्या अति कठीण काळात मी व आमदार महेश बालदी पीपीई किट घालून रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करीत होतो लोकांना आवश्यक मदत करीत होतो. कोरोना, निसर्गवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा अनेक प्रसंगात राज्यातील भाजपचे नेते प्रत्यक्ष गेले मात्र राज्यातील मंत्री मदत न करता फक्त दिखावे करत सुटले, असा टोलाही त्यांनी लगावला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!