कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या दोन बाजू- लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल दि.२: कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज खांदा कॉलनी येथे केले.
युवकांच्या समस्यांची जाण असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल, सीकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘महारोजगार मेळावा २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी उपमहापौर सीता पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले कि, पनवेल विभाग सर्व दृष्टिकोनातून प्रगत होत आहे. येथे उद्योग व्यवसाय येत असताना बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संधी येतात आणि त्या घेणे महत्वाचे आहे. घरी बसून काम मिळत नाही मेहनतीची तयार असली पाहिजे. एखादा उमेदवार नवीन असेल तर त्याला डावलू नका त्याला प्रशिक्षण देऊन सेवेत घ्या, असा मार्गदर्शक सल्ला त्यांनी कंपन्यांना दिले. तसेच नोकरीत समाविष्ट झाल्यानंतर कंपनीची प्रगती कशी होईल याकडे कामगारांनी लक्ष दिले पाहिजे. त्या अनुषंगाने उमेदवार आणि संबंधित कंपन्यांचे समन्वयही तितकेच महत्वाचे आहे, असेही नमूद केले तसेच या मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, २०१४ सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध धोरणे अंमलात आणली त्यामुळे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जाणार आहे आणि विमानतळ हे ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे. या विमानतळाची प्रतीक्षा गेल्या पंधरा वर्षांपासून होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला वेग आला. विमानतळामुळे देशाची अर्थव्यवस्था एक टक्क्याने वाढणार आहे आणि या अनुषंगाने त्याचा चांगला परिणाम देशाच्या विकासासाठी होणार आहे.प्रकल्पांच्या माध्यमातून परिसराचा विकास होणार असून रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अशा मेळाव्यांचे आयोजन त्यातील एक महत्वाचा भाग आहे. सुरुवातीला या मेळाव्यात ४० कंपन्यांचा सहभाग होता मात्र आता ८१ कंपन्या जोडल्या गेल्या आहेत आणि त्यातून चार हजार नोकरीची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत, असे सांगतानाच या मेळाव्याच्या नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजनाबद्दल ऍड. चेतन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के.पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मेळाव्यासंदर्भातील माहिती विशद केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने यंदाही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होते. त्यानुसार विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित अशा जवळपास ८१ कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळाली. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल उमेदवारांनी लाभ घेतला. यावेळी ५७८१ उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग घेऊन मेळावा यशस्वी केला. यावेळी काही पात्र उमेदवारांना ‘ऑन दि स्पॉट अपॉईंटमेंट लेटर’ देण्यात आले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!