उरण दि.15 (विट्ठल ममताबादे) करोना या जीवघेन्या व महाभयंकर साथीच्या रोगाने जसे भारतात प्रवेश केला तसे त्वरित 22 मार्च 2020 पासून संबंध देशात लॉक डाउन व संचार बंदी लागू करण्यात आली. करोना रोगाचे समूळ उच्चाटन करायचे असल्याने नागरिकांनीही या मोहीमेला अर्थातच लॉक डाउन व संचारबंदिला मोकळेपणाने जाहिर पाठिंबा दिला मात्र दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या करोना रुग्ण संख्येमुळे लॉक डाउन मात्र वाढतच गेला.त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा उद्योगधंदे व्यवसाय नियमा नुसार बंद करण्यात आले.यामुळे दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. वारंवार लागू होणाऱ्या लॉक डाउनमुळे नागरिकांचे पूर्ण कंबरडे मोडले असून नागरिकांना विविध आर्थिक व मानसिक समस्यांना खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले. हे सर्व नागरिकांनी सहनही केले आता मात्र वारंवार होणाऱ्या लॉक डाउनमुळे जनता पूर्ण हैराण झाली आहे. यावर लवकर योग्य व प्रभावी तोडगा न निघाल्यास जनतेला नको त्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
संपूर्ण देशात लॉक डाउन केल्याने 22 मार्च 2020 पासून संपूर्ण उरण तालुक्यातही लॉक डाउन जाहिर करण्यात आले. केंद्र व राज्य सूचनांचे वेळोवेळी पालन करत त्या त्या परिस्थिती नुसार उरण तालुक्यात स्थानिक प्रशासनाद्वारेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लॉक डाउन जाहिर करण्यात आले. काही दिवसात हा रोग आटोक्यात येईल असे नागरिकांना वाटले होते. मात्र आज 5 महीने होत आले तरी करोना रोगाचा प्रादुर्भाव नष्ट होत नाही. त्यामुळे उरण मधील नागरिक या सततच्या लॉकडाउनमुळे पूर्णपणे वैतागले आहेत. लॉक डाउनमुळे उपजिविकेचे, उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध होत नसल्याने उरण मधील नागरिकांना आता आपले पोट कसे भरावे ? आपला चरितार्थ कसा चालवावा ? याची चिंता पडली आहे. हाताला काम नाही तर पैसा कुठून येणार ? एखाद्या कडून पैसे किंवा विशिष्ठ रक्कम घेतली तर ती कशी फेडनार ? ती रक्कम किती दिवस पुरनार ? कोणाकडे पैसे मागायचे ? काय खाणार ? जगायचे कसे ? असे अनेक प्रश्न उरणच्या नागरिकांना पडले आहेत. नागरिकांना आपल्या चरितार्थासाठी पूर्णपणे प्रशासनावरही अवलंबून राहता येत नाही. अनेक ठिकाणी मनुष्यबळाअभावी योग्य व्यक्ति पर्यंत शासनाच्या सेवा सवलती पोहोचतच नाहीत.रेशन धान्याच्या बाबतीत अडचणी येतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे खूप मोठे हाल होत असून लॉक डाउन मुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे सर्वसामांन्यावर आता ‘आत्महत्त्या’ करण्याची वेळ आली आहे.
उरण तालुक्याचा विचार करता व वाढत्या करोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरवातीपासुनच JNPT बंदर, टाऊनशिप,उरण मधील सर्व CFS गोडावुन, विविध कंपन्या, प्रकल्प, उद्योग धंदे बंद ठेवावित अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे प्रशासनाने जाणून बुजुन दुर्लक्ष केले. लॉक डाउन सुरु होताच JNPT बंदर, CFS, विविध कंपनी, प्रकल्प,उद्योगधंदे या ठिकाणी लॉक डाउन(बंद) न करता शहरी व ग्रामीण भागात लॉक डाउन जाहिर करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु झाला. तो आजही सुरु आहे. आणि हे असेच सुरु असेल तर हा जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार पुढ़ेही सुरु राहिल. जखम पायाला आणि उपाय हाताला अशी अवस्था उरण मध्ये झाली आहे. नेमके समस्यावर उपाययोजना करण्याऐवजी नको तिकडे लक्ष दिले गेल्याने प्रशासणावर ताण वाढुन करोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्याएवजी करोना वाढतच गेला. आजही तो वाढ़तच आहे. अधिकारी वर्गाँकडे कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने, कोणतेही व्हीजन नसल्याने वारंवार लागू करण्यात येणारे लॉक डाउन नेहमी अयशस्वी होताना दिसून येते.काही अधिकारी वर्ग ऐसी मध्ये बसुन प्लानिंग करत कामकाज करत असल्याने योग्य तो परिणाम दिसून येत नाही. लॉकडाउनचे कोणतेही चांगले परिणाम किंवा रिझल्ट आता पर्यंत दिसून आलेले नाहीत.
आता रायगड जिल्ह्यात लॉक डाउन 15 जुलै 2020 ते 24 जुलै 2020 पर्यंत लागू करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचा विचार करता सततच्या लॉक डाउनमुळे उरण मध्ये तरुणांचे रोजगार बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. उपजिविकेचे, उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. शासनाकडुनही कोणतेच प्रकारची मदत नाही. कोणापुढे हातही पसरु शकत नाही. कोणा जवळ सांगू सुद्धा शकत नाही. अश्या परिस्थितीत येथील बेरोजगार तरुण वर्ग, येथील नागरिक अडकला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे उपासमारी, चोरी, भांडण, वादविवाद अश्या गुन्हेगारीला चालना मिळत आहे. त्यामुळे उरण मध्ये लॉक डाउन यशस्वी करायची असेल तर उरण मधील सर्व CFS गोडावुन, JNPT,सर्व कंपन्या, प्रकल्प, उद्योगधंदे किमान 21 दिवसासाठी बंद करण्यात याव्यात. तरच करोना रोगाचे उच्चाटन करणे शक्य आहे. नुसते वारंवार केवळ शहरी व ग्रामीण भागात नागरिकांना वेठीस धरून लॉक डाउन लागू केल्यास त्याचा काहीही फायदा होणार नाही. अश्या लॉकडाउनचा उपयोग केवळ ‘शून्य’ होणार आहे. अश्या प्रकारच्या लॉकडाउन मधून काहीच साध्य होणार नाही. लॉकडाउन लागू करताना सर्वांगीण सर्वकष ,सर्व बाबींचा साधक बाधक विचार करून लॉक डाउन लागू केला तरच तो यशस्वी होईल. जनतेचे मत विचारात न घेता एकांगी वृत्तीने लॉक डाउन जाहिर केला तर तो कधीच यशस्वी होणार नाही किंवा त्याचे योग्य परिणाम दिसून येणार नाही. आणि अश्या लॉक डाउनचा काहीच उपयोग होणार नाही. अश्याने करोना रोगाच्या रुग्णची संख्या निश्चित कमी तर होणार नाही उलट ती वाढतच जाणार. प्रभावी उपाययोजना न करणे, लॉक डाउन व संचार बंदीची योग्य अंमलबजावणी न करणे,प्रशासना कडुन नागरिकांची होणारी हेळसांड, कंपनी प्रकल्प, उद्योग धंदे बंद करण्याऐवजी सुरु ठेवणे याविषयी तरुणांमध्ये नाराजी आहे. याबाबत खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्हॉट्स ऍप, फेसबुक आदि सोशल मिडियावर व्यक्त केली जात आहे. खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाद्वारे उरण मधिल नागरिकांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने जनतेचे मत लक्षात घेवून एकांगी विचार न करता लॉकडाउन योग्य रित्या लागू करावी नाहीतर पुन्हा ‘लॉकडाउन लागुचा आदेश’. पुन्हा आहे तिच परिस्थिति. साध्य मात्र काहीच नाही.
