ठाणे दि.२०: ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांचं आज निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. श्रीकांत नेर्लेकर म्हणजे आमचे गुरुजी हे ठाण्याचा चालता-बोलता इतिहास होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते.
काही दिवसांपूर्वी घरात पडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर त्यांना खाजगी रूग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूमध्ये गाठ झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती.
ठाण्यातील अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडली. ठाण्यातील अनेक इतिहासकालीन वास्तू आणि संस्थांवर त्यांनी लिखाण केलं होतं. तसेच ठाणे शहराबद्दलची इत्यंभूत माहिती त्यांना होती. विविध विषयांवरचे त्यांचे माहितीपूर्ण लेख, सातत्याने वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायचे.
त्यांचं ठाण्यावर लिहिलेलं एक पुस्तकही प्रकाशित झालं होतं. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, नातू असा परिवार आहे. खबरबात परिवारा तर्फे श्रीकांत नेर्लेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.