रत्नागिरी दि.१९: कोकणात रत्नागिरीसह रायगड जिल्ह्याच्या काही परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
संगमेश्वर तालुक्यात आज दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. करजुवे, माखजन, बुरंबाड, गोळवली, धामणी, साखरपा परिसरात गारपिट झाली. वादळीवाऱ्याने साखरपा परिसरात दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विज पुरवठा खंडित होऊन अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडल्याच्या घटना घडल्या आहेत. साखरपा येथे 45 मिनिटे पावसासह वादळीवऱ्यासह गाराही कोसळल्या. साखरपा मध्ये झालेल्या वादळामुळे परिसरातील वीज गायब झाली होती. परंतु महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रातोरात काम करून सुमारे 65% पेक्षा अधिक परिसरातील वीज पुरवठा पूर्वरत केला.
महाडमध्ये आज संध्याकाळी ४ वाजल्या पासुन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सोसाट्याचा वारा, वादळी वाऱ्यांमुळे वातावरणांत बदल झाला. सहा वाजल्यानंतर गारा सह मुसळधार पावसाला सुरवात झाली. तालुक्यातील ग्रामिण भागाला देखिल वादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन पुर्ण विस्कळीत झाले. वादळी पावसामुळे महाड तालुक्यांतील वीज पुरवठा खंडित झाला. शहरांतील वातावरणांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचा तणाव असताना अवकाळी पावसाने कडधान्य तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. वादळामुळे ग्रामिण भागांत घरांचे देखिल नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तसेच पोलादपुर तालुक्याला देखिल पावसाने चांगलेच झोडपून काढले.
