२०२९ मधील युवा ऑलिंपिक च्या संयोजनाची तयारी
चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन
मुंबई, दि. १५: खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते.खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०३६ मधील ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याचे निःसंदिग्ध अशी ग्वाही दिली. त्यांनी २०२९ मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली.
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनात्वाच्या खूणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधी समोर सादर करण्यात आला. या सादरीकरणाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर दुमदुमून गेले.
भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा तर मुंबईला पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या संयोजनाची संधी मिळाली आहे. १५ ते १७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत हे अधिवेशन होत आहे.
अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह जगभरातील ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तथा भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षा पी. टी. उषा, आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी उपस्थित तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह तसेच क्रीडा तसेच कला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
